Monday, March 7, 2016

सप्तरंगी संवाद

हा आहे सतत आपला स्वतःशीच सुरु असलेला संवाद, तो तर कायम सुरूच असो पण मग तो सप्तरंगीच का ? काळा , पांढरा , लाल, निळा का नाही ? तर येणारे विचार कधीच एका रंगात असे नसतात, सगळेच विचार दोन रंगात, काळ्या आणि पांढऱ्यात (हीच उच्चांकाची परिसीमा समजून ) चांगल्या वाईटात वेगळे करता येत नाहीत. एकाच वेळी आपण दुख्खी , आनंदी , उदास किंवा निर्विकारहि असतो म्हणजेच पांढरे शुभ्र विचारांना हि करडी किनार असतेच. म्हणूनच एकाच वेळी आपण आपल्या भावनांचे वेगेवेगळे पदर उलगडत असतो. 

म्हणूच सप्तरंगी, विविध रंगांनी रंगलेला संवाद !!

Thursday, February 25, 2016

बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण

ऐतिहासिक नोंदी : बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण  :

1. सगळेच शहाणपण येण्यासाठी movie पहायची नाही तर fb , मिपा , नेट नेटाने चाळायची गरज असते. 

2. आत्ताच आलेल्या सूत्रांनुसार यापुढे उठसुठ कुठल्याही सुमार गोष्टींसाठी पाकिस्तानात जा असे म्हणायची गरज नाही तर सरळ बाजीराव-मस्तानी पहा असेही म्हणू शकतो, equal आणि उचित अपमान केल्याचे श्रेय पदरी पडेल. 

3. बाजीराव (युद्ध?)कला निपुण, शूर-वीर, सलग लढाया जिंकणारा वगैरे नक्कीच होता पण ते युद्धात कि अजुन कशाकशात हे फक्त भन्साळीच सांगू शकतात, त्यासाठी इतिहास वाचायची गरज नाही कारण तो इतिहास आता इतिहासात जमा झालेला आहे आणि भन्साळीनी तो नव्याने घडवला आहे याची नोंद घ्यावी.

4. Zero figure हि संकल्पना अशातली नसून फार पूर्वीपासूनच त्याची मुळे रोवली गेलेली आहेत. त्यामुळे सर्व जिमधारकांना आणि dietitians वर पेटंट चोरल्यामुळे दंड व कर आकारण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

5. सालसा ,  डिस्कोथेक , डान्सफ्लोर , इत्यादी अंगविक्षेप पुर्वीपासुनच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होते तर योगा , भरतनाट्यम, कथ्थक इत्यादी प्रकार अगदी आत्ताआत्ताचे आहेत. नवनवीन सालसा, डान्सफ्लोर (खर तर डान्सबार) काढून आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवायचेच असे सरकारचे धोरण आहे. 

6. तेंव्हाचे तंग आकार उकार दाखवणारे कपडे आपले आत्ताचे मागासलेपण दाखवतात, आपण आपल्या ढगळ अंगभरून कपडे घालण्यामुळे आपण एका मुलाला कपड्यांपासून वंचित तर ठेवत नाही यावर चर्चा सुरु आहेत. खरे तर आत्ता थोडेफार जे कमी कपड्यातील पिक फोफावलेले दिसते आहे त्याचे श्रेय मस्तानी आणि काशीबाई म्हणजेच सर्वार्थाने बाजीराव यांजकडे आहे.

7. सर्वधर्म समभाव . द्वि- भार्या पद्धती या आपल्या पुढारलेल्या पूर्वजांनी पूर्वीच अंगीकारलेले होते, आपल्याला आपली  संस्कृतीची खर्या अर्थाने जतन करायची असेल तर आपणास हे परत सुरु करायला हवे. प्रत्येकास किमान दोन बायका असणे अपेक्षित आहे. तरच भन्साळीचा उद्देश सफल संपुर्ण होईल. 

यावरून एकूणच आपले पुर्वज कित्येक गोष्टींचे पुरस्कर्ते होते आणि किती किती पुरोगामी विचारांचे होते ते कळुन येते. त्यामुळेच ते मस्तानी आणि काशी हा वाद खर तर फोल ठरतो.
ऐतिहासिक नोंदी आणि त्याबरोबरच बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपणही संपले याची तमाम वाचकांनी नोंद घ्यावी:)  

Shilpa

Monday, December 28, 2015

प्रतिबिंब

हे तुझे माझ्यात भिनणे…
कि माझे तुझ्यात विरघळणे
मग…सहज म्हणून तुला वजा करून बघितले
तर...तर आरशाने माझे प्रतिबिंबच नाकारले.....

Sunday, November 22, 2015

मैत्री


आम्ही रोज भेटायचो नाहीच जमले तर बोलायचो तेही अगदी मनाच्या तळापर्यंत पोहोचेपर्यंत, सगळे नितळ स्वच्छ दिसेपर्यंत...भरलेले आभाळ कोसळून पाण्याचा निचरा होईपर्यंत आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंग डोळ्यांचे पारणे फिटवेपर्यंत…

आम्हाला वेळेचे मुळी भानच नसायचे. रोजचा नवीन दिवस, नव्या गुजगोष्टी.. कधी तलत , मन्ना डे , गुलाम अली तर कधी शमशाद बेगम अन सुर्रेया... सारे भेटीसाठी कायमच हजर असायचे… नवीन काहीतरी वाचलेले,  नवीन कधी सुचलेले एकमेकांना कधी किती सांगू, किती बोलू आणि किती नको असे होऊन जायचे... कितीही वेळ गेला तरी आमची द्रोपदीची थाळी सदा न कदा भरलेली !! कधी नवे रंग, नवे बंध तर कधी आंतरिक नातेसंबंध....... आणि या मनमुराद गप्पानंतर सारे कसे अगदी स्वच्छ - शांत, भर उन्हात नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीसारखे, दिलासा देणारे, मरगळ घालवणारे आणि प्रफुल्लित करणारे… नव्या सुर्योदयाची नव्याने सुरुवात करून देणारे अन नवरंग फुलवणारे....

मात्र हळूहळू सगळे बदलत गेले, तसे विशेष असे काही घडले नाही पण विनाभेटीचे दिवस विनासायास सरू लागले…ओठापर्यंत काहीच पोहोचेनासे झाले , फोन ची जागा sms ने घेतली आणि sms ची जागा e -mail, पुढे पुढे तर ते हि बंद झाले. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊ लागली पण पावसाच्या सरीची चाहूलही लागेनाशी झाली. मन्ना डे च्या ऐवजी मुकेश भेटीला येऊ लागला. मनातल्या गुजगोष्टींची जागा मनातले सल घेऊ लागले. कालांतराने ते सल हि सरले अन आठवणीच काय त्या उरल्या , ज्या अजूनही कधी गरम कढ तर कधी सुखद गारवा घेऊन भेटीला येतात. पण हो, त्यालाही जुन्या गर्भरेशमी पैठणीतील नाचर्या मोरांची वेलबुट्टी आहे आणि त्यांना मी अजूनही अलगद मोरपिसागत जपून ठेवले आहे.....

मंद सुवासिक अत्तराच्या कुपीतील अत्तर तर उडून गेले आहे, पण ती रिकामी अत्तराची कुपी मी घट्ट बंद करून अजूनही शिसवी कपाटाच्या कुलूपबंद खणात जपून ठेवली आहे . जेंव्हा कधी फार उदास एकटे एकाकी वाटते तेंव्हा मी हळूच कुणी आजूबाजूला नाहीये हे बघून ती अत्तराची कुपी उघडते . उरलेला हलका हलका मंद सुगंध श्वासभरून घेते आणि चटकन बंद करते वर्षानुवर्ष तो असाच जतन करण्यासाठी आणि पुरवून पुरवून वापरण्यासाठी :)

शिल्पा   

Friday, November 20, 2015

मित्र

मित्र

माझा मित्र फक्त मीच बनावे

मनातले सगळे सल सांगायला
आणि ते अगदी तसेच्या तसे समजून घ्यायला
कायम मला अभिप्रेत असलेलाच अर्थ लावायला

नवीन तीरपांगडे विचार जोजवायाला 
कधीच मी चुकतोय असे न सांगायला
आणि प्रत्येकच गोष्टीवर गुमान मान डोलवायला

माझे तिरकस अतिरेकी तोडगे सरळपणे मानायला
माझ्याशी मनमुराद गप्पा मारायला 
आणि माझ्याच कानांनी माझे बोलणे ऐकायला !!


Tuesday, November 17, 2015

बहर

आपण कितीही आपले weather बरोबर घेऊन फिरलो तरी ते सोनेरी, चंदेरी दिवस त्या त्या गोष्टींची परत परत आठवण करून देतातच…दोन वर्षापूर्वी याच दिवसांत... तीच पानगळ , तोच पिवळेधमक सडा आणि तीच कविता !!

सोनेरी किरणांची झालर लेवून
तू माझ्या खिडकीतून डोकावत होतास
कोजागिरीच्या चांदण्यात
मला नाहून टाकत होतास

घट्ट मिटत्या काळोखात
छटा माझ्या आजमावत होतास
तुझे चित्र साकारण्यात
दिवस माझा सरत होता

रोज निराळ्या पिवळ्या रंगाचा
रंग मला उमगत होता
तरीही माझ्या पटावर तू
काही केल्या उमटत नव्हतास

कारण…. बहुदा…
शरदातील त्या पानगळीचा
मला कधीच अडसर नव्हता
माझ्या दारच्या पळसाला
सतत तोच बहर होता…

शिल्पा


Wednesday, May 13, 2015

vibgyor अर्थात सप्तरंग.

रंगांचे वेड मला लहानपणापासूनच होते, रंगांशी खेळत राहणे, काहीही वेडेवाकडे काढत राहणे मला आवडे. मोर काढून त्यात रंग भरणे हा माझा फावल्या वेळातील आवडता उद्योग होता तेंव्हा , इतके कि कित्येकदा आमची रांगोळी भरपूर रंग भरलेल्या पिसारा फुलवलेल्या सुंदर मोराचीच किंवा फार फार तर रंग-बिरंगी फुलपाखराची असायची, बहुदा त्या मोराचे पाय दिसत नसत तेंव्हा.…मन अगदी फुलपाखरासारखेच स्वच्छंदी होते बहुदा. त्यावेळच्या कल्पना त्या वयाला अनुसरूनच असाव्यात. त्यावेळेस फक्त bright colours आवडत, दिसत. तांबड्या , हिरव्या रंगांपलीकडे जग दिसतच नव्हते. कोणत्याही dull कलर चा तर दुरदुरपर्यंत पण संबंध नव्हता.

जसे जसे वय वाढत गेले तसे मात्र प्रत्येक कलरचा शिरकाव होऊ लागला आयुष्यात . जसे रंग दिसत गेले तसे आपोआपच आपलेसे करत गेले , त्यांना तसे आपलेसे करण्याशिवाय पर्यायच नव्हता. रंगांची पुर्णपणे ओळखही नव्हती तेंव्हा. आजूबाजूला अचानक दिसणारे नवनवीन, हिरवे पिवळे निळे अपरिचित रंग आणि त्यांच्या असंख्य छटा मनाचा गोंधळ उडवून टाकत होते. काही तर वर-वरून एकसारखे दिसत मात्र आतून एकदमच अजब त्यांना ओळखणे handle करणे जड जात होते. हि मोठी जोखीमच होती.

आता काही ठोकताळे बांधणे, अभ्यास करणे आणि थोड्या तरी झेपेल तश्या अभ्यास पूर्ण steps घेणे जरुरी होते. कालांतराने ते थोडे फार जमू लागले. टप्प्या टप्प्याने मजल गाठत आता गोष्टी थोड्या आवाक्यात आल्या होत्या. मग हळहळू प्रत्येक रंगांची एक एक छटा, त्याची पोत आणि गुणधर्म नव्याने समजून घेण्याचा प्रयास करू लागले. हे सगळे जवळून बघणे हा एक अनुभव नवीन होता खरा पण आता हे सगळेच उमगू लागले होते, त्यांचे नवीन अर्थ आता उलगडू लागले होते पण हे सगळे वाटते तितके सरळ सोपे चुटकीसरशी जमणारे नव्हते. प्रत्येक रंगांची quality, गहराई , consistency ओळखत त्यांना चुचकारत आपलेसे करणे भाग होते . एकत्र झालेल्या प्रत्येक रंगालाही मग हळुवार वेगळे करत त्याचे निकष ठरवत गेले, त्यात बराच काळ गेला.

आज हि पुरती ओळख पटली आहे असे म्हणणे नक्कीच योग्य ठरणार नाही ओळख पुरेशी पटलेली नाहीच पण आता अगदी सैरभैर अवस्था तरी होत नाही. अजूनही कधी मधी ग्रे कलर कॅनव्हास वर वाजवीपेक्षा अंमळ जास्तच भरकटतो, त्यावर हमखास असा रामबाण उपाय नसतोच पण फार काळ त्याला जवळ राहू देणे इष्ट नाही हे जाणते आणि त्याला कधी कसेबसे कधी प्रयत्नपूर्वक बाहेर काढत जाते. आणि बाकी सप्तरंगाना जवळ करत … त्यातही माझ्या आवडीच्या आनंदाची उधळण करणाऱ्या केशरी रंगाला , समतोल साधणाऱ्या निळ्या रंगाला , सर्वाना सामावून घेऊन पुढे जाऊ पाहणाऱ्या गर्द हिरव्या रंगाला, स्वतंत्र निश्चयी वृत्तीच्या काळ्या कुळकुळीत रंगाला आणि आसपास सतत possitive energy पसरवत प्रेरणा देणाऱ्या लाल भडक रंगाला जास्त प्राधान्य देत राहते .

अर्थात आजही माझ्या प्रत्येक art मध्ये मला ग्रे ची ती छटा सतत दिसतेच , आणि त्याचे तसे अस्तित्व मी मान्यच केले आहे, तो कलर सगळा स्मृतीपट माझ्यासमोर उलगडवतो. शिखराकडे बघताना पायथ्यालाही स्मरण्याची जाणीव आणि जगण्याची प्रेरणा तो ग्रे रंग पदोपदी देत असतो. कोणत्या रंगांशी किती जवळीक साधायची याचे तो सतत भान करून देतो आणि मला सतत काहीतरी चांगले करण्यासाठी उद्युक्तहि ठेवतो . त्याच्याशिवाय माझे सगळे आवडते रंगही अधुरे आहेत म्हणूनच माझ्या सप्तरंगात त्या करड्या रंगालाही तितकेच महत्वाचे स्थान आहे.

शेवटी त्या इंद्रधनुष्याचे सप्तरंग त्या काळ्या ढगातुनच डोकावतात आणि सूर्यप्रकाशाबरोबरच रंगांची चौफेर उधळण दाही दिशांना करतात हे विसरून कसे चालेल.

Shilpa